मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला सरकार सामोरं जात आहे. विरोधीपक्षाने चहापानावर बहिष्कार टाकून पत्र दिले. खोटं बोल पण रेटून बोल अशाप्रकारे खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीत थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं, अशाप्रकारच्या मानसिकतेते विरोधीपक्ष गेला आहे, असं मला वाटतं. त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात उल्लेख करायचा असेल, तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे, अशाप्रकारचं हे पत्र आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं
फडणवीस पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, त्यांनी सांगितलं की, विदर्भातील सिंचनाच्या प्रकल्पांना मार्गी लावण्यात अपयश आलं आहे. आता हे अपयश कोणाला आलं होतं? विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही. विदर्भातल्या बहुतांश प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही, तर त्याचं कामही आम्ही सुरु केलं. बळीराजासारख्या योजनेतून जवळपास ८७ प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत. २०१९ मध्ये वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचा जीआर आपण काढला.
मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एव्हढीही हलली नाही. पुन्हा नवीन सरकार आल्यावर आम्ही त्याबाबत सर्व मान्यता घेतल्या आहेत. लवकरच तो अंतिम मान्यतेकडे चालला आहे. त्या पत्रात उद्धव ठाकरे यांचीही सही आहे. नाना पटोले यांचीही सही आहे. त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या काळात एकाही प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही? वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मान्यता का मिळाली नाही.
पेपरफुटीच्या प्रश्नावर जे बोलत आहेत, तर सर्वात जास्त पेपरफूट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये पेपरफूट झाली, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यासंदर्भात आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या, त्याचा सर्व रिपोर्ट या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पाठ फिरवली असं ते सांगतात, त्यांच्या काळात तिसऱ्या-चौथ्या नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन्ही वर्षी नंबर वनवर आलेला आहे.