पुणे : उलट्या दिशेने येऊन वाहतूक कोंडीस आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्यास वाहतूक शाखेने बुधवारपासून (ता. १६) सुरवात केली आहे. एका दिवसांत तब्बल ५०० वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडे दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी रस्त्यांची दुरवस्था आणि बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी फुटत नाही. अनेक वाहनचालकांवर ४ ते २५ हजारांपर्यंत दंड पेडिंग आहे. पुणेकरांना वेळोवेळी शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून करण्यात येतो. मात्र, तरीही वाहन चालक सर्रास नियम मोडतात. यामुळे वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, तरीही ते नियम मोडण्यास पुढेच असतात. दंडात्मक कारवाई होऊनही कोणताही परिणाम होत नाही. पोलिसांनी मागील दिड महिन्यात वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ठिकठिकाणी दंडात्मक कारवाईस सुरवात केली होती. दिड महिन्यात उलट्या दिशेने येणाऱ्या तब्बल १४ हजार तर ट्रीपल सीट जाणाऱ्या तब्बल १६ हजार वाहन चालकांवर कारवाई केली.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही वाहन चालकांना शिस्त लागली नाही. यामुळे अशा वाहन चालकांची वाहनेच जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार बुधवारपासून कारवाई सुरू झाली. एकाच दिवसांत तब्बल ५०० वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वाघोलीत अवजड वाहनांस बंदी…
शहरात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अवजड वाहतुकीस वेळ ठरवून दिलेली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे. तरीही ठरवून दिलेल्या वेळेत अवजड वाहने रॅश ड्रायव्हिंग करताना दिसत आहेत. अशाच एका अपघातात वाघोली येथे एका महिलेस आपले पाय गमवावे लागले. ही बाब गांभीर्याने घेत वाघोलीतील अवजड वाहतूक पूर्ण वेळच बंद केली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
