लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. परंतु अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नाही. भाजपा आणि एनडीएला मिळून ३५० च्या वर जागा मिळतील असा अंदाज आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार देशातील ५४३ जागापैकी ३५३ ते ३६८ जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खात्यात ११८ते १३३ जागा जाण्याची शक्यता आहेत. तर इतर पक्ष ४३ते ४८ जागी जिंकण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक -PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५९ आणि इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुतीला २७ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे
